संत तुकाराम अभंग गाथा ४४०१ ते ४५८३

संत तुकाराम अभंग ४४०१ ते ४५८३

संत तुकाराम गाथा

अभंग ४४०१ ते ४५८३

अभंग ४४०१
कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ।
कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥
कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान ।
नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध ॥ध्रु.॥
नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ।
मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥२॥
न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ।
न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥
आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी ।
तुझीं ब्रिदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका म्हणे ॥४॥
अभंग ४४०२
भीमातीरवासी । तेथें नश्चियेंसी काशी ॥१॥
मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥
घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥
भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी म्हणे तुका ॥३॥
अभंग ४४०३
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाईंची पावेल ॥१॥
श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥
जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥२॥
तुका म्हणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥३॥
अभंग ४४०४
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥१॥
काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥
अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥२॥
तुका म्हणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥३॥
अभंग ४४०५
हें चि मागणें विठाबाईं । पायीं ठेवूनियां डोईं ॥१॥
शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥
मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥
तुका म्हणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥
अभंग ४४०६
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥१॥
तुजलागीं दानें तुजलागीं तीर्थे । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥
सकळ चित्तवृत्ति दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥२॥
तुका म्हणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥३॥
अभंग ४४०७
नीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥
कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥
वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥
नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥
तुका म्हणे भेटी देई नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥
अभंग ४४०८
पूर्वा बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥
अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥
तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥
नारद प्रर्‍हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥
अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥
धर्माचें उच्छष्टि अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥
जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥
तुका म्हणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥
अभंग ४४०९
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्ती ॥१॥
तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥
आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥२॥
आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया ॥३॥
तुका म्हणे देई चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥४॥
अभंग ४४१०
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥
अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥
तुका म्हणे आम्ही पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥
अभंग ४४११
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥
नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुम्हांस फुकाचें हें ॥ध्रु.॥
संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥
तुका म्हणे आम्हीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥
अभंग ४४१२
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥
बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥
बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥
ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥
अभंग ४४१३
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥१॥
सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया ॥ध्रु.॥
करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा ॥२॥
जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥३॥
तुका म्हणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥४॥
अभंग ४४१४
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥
शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥
इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥
तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥
तुका म्हणे देई दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रम्हादिकां ॥४॥
अभंग ४४१५
पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥१॥
काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
करिशील तरी नव्हे कांइ एक । निर्मिलें त्रैलोक्य हेळामात्रें ॥२॥
समर्थासि काय आम्हीं शिकवावें । तुका म्हणे यावें पांडुरंगा ॥३॥
अभंग ४४१६
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आम्हां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥
भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥
आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥
वाटे चित्ती काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥
तुका म्हणे माझे पुरवीं मनोरथ । येईं गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥
अभंग ४४१७
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥१॥
नामाचा प्रताप ब्रिदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥२॥
माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥३॥
तुका म्हणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥४॥
अभंग ४४१८
रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥
धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥
रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥२॥
तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य जालों आम्हीं ॥३॥
अभंग ४४१९
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥
होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥
तुका म्हणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥
अभंग ४४२०
भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥
वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥
अकरालक्ष योनि किड्यामाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पर्‍यांमध्ये ॥२॥
तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥
एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥
तुका म्हणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥
अभंग ४४२१
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून ॥१॥
कोण करील माझें साहे । चित्ती विचारूनि पाहें ॥ध्रु.॥
तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥
तुका म्हणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥
अभंग ४४२२
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज ॥१॥
आहें अमंगळ दुर्बळ । होई दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥
बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥
तुका म्हणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥
अभंग ४४२३
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥
गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥
काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥२॥
तुका म्हणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥३॥
अभंग ४४२४
अगा पंढरीच्या राया । वेगीं येई तूं सावया ॥१॥
दीनबंधु तुझें नाम । देई आपुलें आम्हां प्रेम ॥ध्रु.॥
जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥२॥
तुका म्हणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥३॥
अभंग ४४२५
विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥
वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥
नामापाशीं चारी मुक्ति । पहा हृदयीं प्रतीति ॥२॥
तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
अभंग ४४२६
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥
आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥
काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥
लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥
तुका म्हणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥
अभंग ४४२७
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥
काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥
न लभे व्रततीर्थदानीं । तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥
साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥
तुका म्हणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥
अभंग ४४२८
गव्हांच्या घुगर्‍या । नाचण्यांच्या पुर्‍या । बर्‍या त्या चि बर्‍या । पाधाणी त्या पाधाणी ॥१॥
काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥
रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥२॥
तुका म्हणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥३॥
अभंग ४४२९
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥१ ॥
म्हणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥
लोभिक तें लोभा लावी । बांधल्या गोवी वांचूनि ॥२॥
तुका म्हणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥३॥
अभंग ४४३०
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥
नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥
तुका म्हणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥
अभंग ४४३१
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥
सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥
आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥
पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥
करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥
स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका म्हणे ॥५॥
अभंग ४४३२
अवघ्या कोल्ह्यांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥
भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥
कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥२॥
दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥३॥
अभंग ४४३३
तुझे म्हणों आम्हां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥
ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥
कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥
तुका म्हणे परीस । सांपडल्या उपवास ॥३॥
अभंग ४४३४
कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रम्हज्ञानाविण चाड ॥१॥
दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥
न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥
तुका म्हणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥३॥
अभंग ४४३५
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥१॥
तेथें आम्हीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥
ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥३॥
अभंग ४४३६
डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥
काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥
आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥
अभंग ४४३७
भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रम्हचारी ॥१॥
ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥
वळीवळी थोरथोर । मोडोनियां केले चूर ॥२॥
वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥
मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥
जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥
तुका म्हणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥
अभंग ४४३८
वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥
आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥
दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥
हात पाय राहिलें कान । नेत्रा पाझर हाले मान ॥३॥
अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥
आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥५॥
लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥
तुका म्हणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥
अभंग ४४३९
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥
नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥
शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥
तुका म्हणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥
अभंग ४४४०
अतित्याईं देतां जीव । नये कींव देवासि ॥१॥
थोड्यासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥
त्यासि परलोकीं नाहीं मुक्ति । अधोगति चुकेना ॥२॥
तुका म्हणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥३॥
अभंग ४४४१
तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥
हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥
जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥
जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥
तुका म्हणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥४॥
अभंग ४४४२
तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥
जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥
साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥
सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥
कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भक्ति घडेल देवा ॥५॥
ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥
तुका म्हणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥
अभंग ४४४३
नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥
रामकृष्ण म्हणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥
नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥
तुका म्हणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥
अभंग ४४४४
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥
दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥
छाटी भगवी मानसीं । व्यर्थ म्हणवी संन्यासी ॥२॥
तुका म्हणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥
अभंग ४४४५
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ १ ॥ डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥
न वर्जितां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥२॥
तुका म्हणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥३॥
अभंग ४४४६
आपटा संवदड रानचारा । दसर्‍याचा होय तुरा ॥१॥
तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥
मृत्तिकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥२॥
तुका म्हणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥३॥
अभंग ४४४७
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल ॥१॥
नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्ती समान ॥ध्रु.॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
तुका म्हणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनामीं ॥३॥
अभंग ४४४८
आम्ही जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥
आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥२॥
येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥
रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥
अभंग ४४४९
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥
ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥
बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥२॥
तुका म्हणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥३॥
अभंग ४४५०
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥
तुझ्या नामबळें तरले पतित । म्हणोनि माझें चत्ति तुझे पायीं ॥२॥
तुका म्हणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥
अभंग ४४५१
उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥१॥
युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥
लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥२॥
तुका म्हणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥३॥
अभंग ४४५२
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥
तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥
तुका म्हणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥
अभंग ४४५३
तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥
हें चिं देई विठाबाईं । पांडुरंगे माझे आईं ॥ध्रु.॥
नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥
सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥
नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण ॥४॥
पुंडलीक पाहोन दृष्टी । हर्षो नाचों वाळवंटीं ॥५॥
तुका म्हणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥
अभंग ४४५४
बाईंल चालिली माहेरा । संगें दिधला म्हातारा ॥१॥
सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥
जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥
न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥
फजित केलें जनलोकीं । मेला म्हणे पडे नरकीं ॥४॥
गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुम्ही मज ॥५॥
तुका म्हणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥
अभंग ४४५५
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥
तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अक्त ते ॥ध्रु.॥
केवड्यामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥२॥
तुका म्हणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥
अभंग ४४५६
शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि म्हणती विष्णूस ही ॥१॥
हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥
अन्य देवतांसि देव म्हणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥
वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥
आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥
धन्य ते वैष्णव भजती केशव । साित्वक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥
तुका म्हणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥
अभंग ४४५७
तुम्ही साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुम्हां घरीं ॥१॥
तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥
कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुम्हांपुढें काय बोलों ॥२॥
तुम्ही अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥
वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥
पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥
समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥
मेरूचा पाठार अवघी ते क्षिति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥
सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥
कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥
तैशी तुम्ही निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥
कृपानिधि तुम्हीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥
अज्ञान मी वेडें म्हणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुम्हां ॥१२॥
बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥
तुका म्हणे तुम्ही संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥
अभंग ४४५८
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव ॥१॥
देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥
नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥
साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥३॥
दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥
तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥
अभंग ४४५९
जयजय म्हणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥१॥
आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥
आपण म्हणे आणिकां हातीं । यज्ञादिकीं नये ते गति ॥२॥
आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि म्हणतां राम ॥३॥
मंत्र जपा हा चि सार । वर्णा याती जयजयकार ॥४॥
म्हणतां राम म्हणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥५॥
अभंग ४४६०
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईंल काळा फोडों डोईं ॥१॥
तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥
येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईंल तें दुरि शृंगारिलें ॥२॥
तुका म्हणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥
अभंग ४४६१
होई आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥
आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तई सकळ चिंता ॥ध्रु.॥
अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥
तुका म्हणे जालें एक चि वचन । केलिया कीर्तन आराणुक ॥३॥
अभंग ४४६२
लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण ।
उद्यांचें आजि च मरण । आणोनि म्हणे हरि भोक्ता ॥१॥
नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं ।
लाभ विचारोनि पोटीं । होई सेवटीं जागृत ॥ध्रु.॥
आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा ।
पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥२॥
म्हणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा ।
होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥
क्षण या देहाच्या अंतीं । जड होउनि राहेल माती ।
परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥
जंव या नाहीं पातल्या विपत्ति । आयुष्य भविष्य आहे हातीं ।
लाभ विचारोनि गुंती । तुका म्हणे अंतीं सर्व पिसुनें ॥५॥
अभंग ४४६३
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥१॥
काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥
काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥२॥
तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥३॥
अभंग ४४६४
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥
दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥
जातीचें मी हीन न कळे भजन । म्हणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥
तुका म्हणे मज म्हणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥
अभंग ४४६५
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥
शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥
शिवास नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥२॥
मरण जालें काशीपुरी । तेथें नाम चि उद्धरी ॥३॥
तुका म्हणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥
अभंग ४४६६
अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥
अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥
सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥२॥
संतांची जो निंदा करी मुखीं जप । खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥
अभंग ४४६७
नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥
म्हणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥
करिती विठोबाची भक्ति । दयाधर्म नाहीं चित्ती ॥२॥
तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥
अंगीं नाहीं क्षमा दया । म्हणती भेट पंढरीराया ॥४॥
नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदक्षिणा ॥५॥
ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥
नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥
जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥
अभंग ४४६८
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साह्य होय ॥१॥
उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साह्य करी ॥ध्रु.॥
शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साह्य करी ॥२॥
असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥
तुका म्हणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥
अभंग ४४६९
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥
बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥
क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥
सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥
तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥४॥
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥
ब्रम्हांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥
प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥
सांडूनि वैकुंठ धांव घाली तई । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥
तुका म्हणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥
अभंग ४४७०
अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥१॥
माझिया गा चित्ति करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥
जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाईंच्या पति कृपावंता ॥२॥
हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा ॥३॥
तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शक्ति नाहीं ॥४॥
न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥५॥
तुका म्हणे हरि करावें या काय । भजनासि साहए होई बापा ॥६॥
अभंग ४४७१
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥
माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥
माझें दुःख जरी ऐकशील सईं । म्हातारा तो बाईं खोकतसे ॥२॥
खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥
पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥
जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥
पूर्व सुकृताचा हा चि बाईं ठेवा । तुका म्हणे देवा काय बोल ॥६॥
अभंग ४४७२
स्वामीच्या सामर्थ्या । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥
पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥
देव ज्यासी साह्य । तेणें केलें सर्व होय ॥२॥
तुका म्हणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥
अभंग ४४७३
नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । म्हणा हरीहरी सर्वभावें ॥१॥
नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥
नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥
गजेंद्राची स्थिति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥
तुका म्हणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकळिलें॥४॥
अभंग ४४७४
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आम्हां दिनानाथें रक्षियेलें ॥१॥
यम नेतां तुम्हां रक्षील हें कोण । तुम्हां धन्यधन्य कोण म्हणती ॥ध्रु.॥
संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम स्थिति सांगितली ॥२॥
तें चि धरोनि चित्ती तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥
अभंग ४४७५
देवासी पैं भांडों एकचत्ति करूनि । आम्हांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥
आम्हां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥
तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आम्हां देशवटी देवो सुखें ॥२॥
देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥
चित्ती धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥
तुका म्हणे सर्व देवाची नष्टाईं । आम्ही सुखें डुलतसों ॥५॥
अभंग ४४७६
भरणी आली मुH पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥
उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥
येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥
तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥३॥
अभंग ४४७७
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥१॥
धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥
भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥२॥
तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥३॥
गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥४॥
तुका म्हणे हातीं । न धरितां गमाविती ॥५॥
अभंग ४४७८
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥
दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥
कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥३॥
तुका म्हणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥
अभंग ४४७९
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥
हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥
गोब्राम्हणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका म्हणे ॥३॥
अभंग ४४८०
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥
उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय म्हुण ॥ध्रु.॥
खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥
हातींचा हिरोनि घातला पोटासी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥३॥
ओंव्या प्रारंभ अभंग ४४८१
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥
याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्ग‍ुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥५॥
या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥
तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥
यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चत्ति ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥
जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥
नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥
डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥
यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥
वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥
विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौर्‍यासी ॥३८॥
शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥
जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥
नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥
कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥
विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥
नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥
त्याची च उच्छष्टि बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥
व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी क्त माता पिता ॥५३॥
तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें रुसिया ॥५४॥
यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥
तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥
जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥
धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥
पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥
मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥
कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥
सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥
नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥
खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥
ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥
ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥
सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥
षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥
देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥
पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥
काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥
तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥
सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥
सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥
आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥
करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥
नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥
राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥
अभंग ४४८२
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगलें हें चत्ति माझें तया पायीं । म्हणउनि घेई हा चि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥
नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तपतीर्था ॥४॥
तीर्था रज माथां वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गातां पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥६॥
त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥
विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवें करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातुसे ॥१०॥
सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग-तया कोण भोगविशी ॥१२॥
विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभा ॥१३॥
लोभें गिळी फांसा आविसाच्या आशा । पडोनि मासा तळमळी ॥१४॥
तळमळ याची तरी शम होईंल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठव हा तरी संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥
जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥
पुढें जाणोनियां करावें संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥२०॥
लावियेलीं कर्में शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥२१॥
पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलेंसें कोणी न म्हणावें ॥२३॥
न म्हणावें जाला पंडित वाचक । करूं मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥
चाळविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥
सुख तरी च घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥
राम हा उच्चार तरी च बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥
पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥
यागयज्ञ तप संसार दायकें । न तुटती एके नामेंविण ॥२९॥
नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥
जाणती हे क्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥
अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥
नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसद्धि हे ॥३३॥
हें चि सुख आम्ही घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥३४॥
कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥३५॥
नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥
विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे कांहीं ॥३७॥
कांहीं कोणी नका सांगों हे उपाव । माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥
जाणोनियां आम्ही दिला जीवभाव । दृढ याचे पाये धरियेले ॥३९॥
धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला ये च विशीं निरधार ॥४०॥
निरधार आतां राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥४१॥
येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥
आपुली पाखर घालुनियां वरि । आम्हांसी तो करी यत्न देव ॥४३॥
देव राखे तया आणिकांचें काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥
तेथें नाहीं रिघ कळिकाळासी जातां । दास म्हणवितां विठोबाचे ॥४५॥
विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥
धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुम्ही ॥४७॥
तुम्ही निदसुर नका राहूं कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥४८॥
गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥
तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥
जाच करिती हे म्हणसी कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥
बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥
धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरि नये ॥५३॥
न ये वरि कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥
त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥
नारायण विसरलीं संवसारीं । तया अघोरीं वास सत्य ॥५६॥
सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥
तुम्ही नका मानूं कोणी विसवास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥
धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूतीं ॥५९॥
दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥
नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तीसी । नाना कर्म त्यासी दुरावती ॥६१॥
दुराविलीं एकें जाणतीं च फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥
वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥
रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥
सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥
वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥
धरूनियां देव राहतील चित्ती । आधींचिया गती आठवाया ॥६७॥
आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥
दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥
मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटीं नेला अधोगती ॥७०॥
गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥
विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥
तरती दुबळीं विठोबाच्या नांवें। संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥
शुद्ध तरी याचे काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥
वेळा कांहीं नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥
भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥
करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥
मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥
पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥
ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥
भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥
ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥
संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥
वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥
सायास केलियावांचुनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥८५॥
नये बळें धड घालूं कांट्यावरि । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥
हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥
सांगती या लोकां फजित करूनि । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥
तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥
गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥
चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥
लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥
संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥
मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठीं ॥९४॥
राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥
नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥
तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥
होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥
चेवले जे कोणी देहअभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥
कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्ही त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥
लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगें संतांचिया ॥१०१॥
अभंग ४४८३
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥
भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥
कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥
अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥
हरिरूपीं दृष्टि कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमष्टि भावना देहाचिया ॥११॥
विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥
अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा ॥१३॥
कृष्णा म्हणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥
ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥
न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥१६॥
रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥
मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥
आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥
अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥
जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥
होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥
निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥
साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥
हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥
व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥
सकळा चोरोनि हरि जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥
उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥
न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥
तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥
बाळक्रीडा प्रारंभ अभंग ४४८४
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥
कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥
आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥
संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करीं ब्रिदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
अभंग ४४८५
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥
आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥
अभंग ४४८६
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया क्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥
घरोघरीं जाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥
लोकां गोकुळींच्या जालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥
जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥
केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥
नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥१३॥
अभंग ४४८७
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥
दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥
ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥
अभंग ४४८८
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
अभंग ४४८९
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । म्हणउनि चोरी नसंपडे ॥५॥
नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळि ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणें भावें चाड एका ॥११॥
अभंग ४४९०
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हणवोनि ॥२॥
नसंपडे इंद्रचंद्रब्रम्हादिकां । अभिमानें एका तळिमात्रें ॥३॥
तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अक्त जे निष्ठ‍ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥७॥
जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्ती सांगितलें ॥११॥
सांगितलें संतीं तुम्हां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥१२॥
दंडूं आम्हीं रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥
अभंग ४४९१
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तिवत्ति समर्पिलें ॥२॥
समर्था तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥
गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥
परी याचि तुम्ही आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥
तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥
अभंग ४४९२
दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥
वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥
यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छष्टि तें खावें धणीवरी ॥७॥
वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥
छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥
अभंग ४४९३
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥
भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥
तुम्हां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपली च आण वाहातसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥
एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥
तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्ती ॥१५॥
चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥
आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥
नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥
अभंग ४४९४
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥
रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥
लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥
कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
अभंग ४४९५
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥३॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे बाळ देवा ॥५॥
बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥
दुणी जालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनियां ॥११॥
आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥
मुळें याच देव न कळे तयांसी । चत्ति आशापाशीं गोवियेलें ॥१३॥
लेंकरूं आमचें म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तो चि भाव ॥१४॥
भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसळितां रवी डेरियांत ॥१५॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥
हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥
नेदी राहों भाव लोभिकांचे चित्ती । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥
अंधळीं तीं तुका म्हणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥
अभंग ४४९६
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौळियांचें ॥६॥
गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
अभंग ४४९७
नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥
तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥
करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥
कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव ॥९॥
जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चत्ति त्यापें ॥१२॥
त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥
कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥
कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
अभंग ४४९८
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥
वांयांविण तुम्हीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥
याचें सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥५॥
लटिकें हें तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥
अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥
आणिका ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसों ॥१०॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥१३॥
अभंग ४४९९
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥
ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥
कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥
खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चत्ति त्यांचें ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥
अभंग ४५००
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥
एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥
जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥
लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥
व्याही भाईं हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥
एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥
लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥१३॥
यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥
खेळतों ते आम्हीं नव्हों नारीनर । म्हणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥
तया ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आम्ही कोणकोणें काय खेळों ॥१७॥
काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥
धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्ती मनीं बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरि जयांचिये चित्ती । तयां नावडती मायबापें ॥२२॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥२३॥
वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका म्हणे हरि बाळलीला ॥२८॥
अभंग ४५०१
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥
नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥
हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥४॥
पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥
तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥
त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
अभंग ४५०२
जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥
लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥३॥
जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥
मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकीं ॥५॥
ब्रम्हांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥
लाघव कळलें ब्रम्हयासी याचें । परब्रम्ह साचें अवतरलें ॥८॥
तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥
भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥
लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥
हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥१८॥
पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझें काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥
देव चि अवगा जालासे सकळ । गाईं हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥
तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥
दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
अभंग ४५०३
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
कळला हा देव तया साच खरा । गाईं वत्सें घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे सेवे संचित हें ॥५॥
अभंग ४५०४
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥
गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरि बांधा त्या ही ॥३॥
त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यातुनि ॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥
मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥
अभंग ४५०५
तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥
करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥
नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥
मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥
तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥
निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥
अभंग ४५०६
तयांसवें करी काला दहींभात । सिदोर्‍या अनंत मेळवुनी ॥१॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥
नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥
द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥
वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥
द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥
तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥
राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥
तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥
गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥
त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥
बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥
पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥
मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥
अभंग ४५०७
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥
सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥
सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥
अभंग ४५०८
जाय फाकोनियां निवडितां गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥
गोविंदे वेधिलें तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥
अभंग ४५०९
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥
उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥३॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥
लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥
हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥
अभंग ४५१०
भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥२॥
दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥
देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥
लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥
सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥७॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥
लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥
देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥
मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥
तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥
मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥
तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१४॥
ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥
मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१७॥
अभंग ४५११
नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥
बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्ती ॥४॥
चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥
चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकळिक देव देखे ॥७॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥
काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनियां ॥९॥
यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥
गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥
पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥
संधि सारूनियां पाहिलें अनंता । म्हणती ते आतां कळलांसी ॥१३॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥
सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥
अभंग ४५१२
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥
आजि आम्हां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥
न वंचत्या गाईं जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥
गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥
अभंग ४५१३
काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥
लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचत्ति माव होती ॥२॥
होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥
जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥
भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥
अभंग ४५१४
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
अभंग ४५१५
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥
मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥
हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥
अभंग ४५१६
काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥
करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥
तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥
अभंग ४५१७
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥५॥
सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि । येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥
विचारीं पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागें ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥
या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥
सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥
नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥
साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥
सांभाळिलें तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें ॥३०॥
अभंग ४५१८
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥
जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चत्ति लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥
कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥
जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥
त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरि जातां वरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥
नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देइल सिव्या ॥११॥
आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
अभंग ४५१९
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतलें गडे सांभाळावें ॥२॥
सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरें ॥३॥
बरें विचारुनी करावें कारण । म्हणे नारायण बर्‍या बरें ॥४॥
बरें म्हणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥
पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥
मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥
अभंग ४५२०
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥१॥
जालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥
देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥
आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । म्हणउनि ऐशी परि जाली ॥४॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥
कळों आलें तीहीं काफुंदे शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥
सांगे आतां हरि तुम्हां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥
परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥
अभंग ४५२१
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥
काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥
जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥
निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥
वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥७॥
सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥
सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥
यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥
अभंग ४५२२
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥
मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥
अभंग ४५२३
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥
अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥
मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥७॥
अभंग ४५२४
आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥
आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥
अभंग ४५२५
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥
पाहिलें पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें जालें आतां ॥७॥
आतां हा उठोनि खाईंल या बाळा । देईंल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥९॥
रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
अभंग ४५२६
म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥
त्याचें आइकोन निष्ठ‍ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥
वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥
वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । कार्‍याकृतांतधूदकारें ॥१०॥
कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥
दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥
चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
जाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरि मुष्टिघातें ॥१४॥
तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥
आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥
कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥
यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
अभंग ४५२७
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥
निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥
एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥
यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव म्हणे हरि पुरे आतां ॥५॥
आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥
यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥
विसरु न पडे संवगड्या गाईं । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥
अभंग ४५२८
अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि ॥२॥
गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशीं ॥३॥
मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळि या दुरी जाऊं नका ॥४॥
कानीं आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥
पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥
आल्या गाईं वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥
लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥
त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥
दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
अभंग ४५२९
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥७॥
अभंग ४५३०
जननी हे म्हणे आहा काय जालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥
काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥
हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥
करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५३१
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥
हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥
थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥
आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥
नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥
तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥
सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥
हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥
मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥
अभंग ४५३२
नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आळिंगिलीं ॥१॥
हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥
दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥
नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥
यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥
हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥
सेवाॠणें तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥
अभंग ४५३३
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥
बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥
सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईंपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥
लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥
अभंग ४५३४
जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥
येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥
इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥
नव्हे तें चि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
अभंग ४५३५
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥
नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥
गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥
वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥
नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका म्हणे वरि भारवाही ॥५॥
अभंग ४५३६
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥
अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥
बुद्धि स्थिर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥
अभंग ४५३७
दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥
आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥
क्रोध देवावरि धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥
अभंग ४५३८
भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसि ॥१॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥
काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥
खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥४॥
कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥
अभंग ४५३९
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिया मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥
नेदाविया काईं म्हसी वांचों लोक । पुरा सकळिक सिळाधारीं ॥३॥
धाक नाहीं माझा गोवळियां पोरां । सकळिक मारा म्हणे मेघां ॥४॥
म्हणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥५॥
मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥६॥
अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
अभंग ४५४०
देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥
नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥
फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥५॥
अभंग ४५४१
तो या साच भावें न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली सिळा ॥१॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥
लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥
आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥
अभंग ४५४२
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥
शिरी धरूं गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥
अशंकित चित्ते न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥
अभंग ४५४३
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥
पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥
आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥
निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥
दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥
सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥
अभंग ४५४४
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काफुंदे रडे कोणी धाकें ॥३॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥
तयाखालीं गाईं वत्सें आलीं लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥
जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥
जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥
अभंग ४५४५
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी ॥१॥
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥
शळिांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥
एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥
हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥
भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥
अभंग ४५४६
वाचाळ लटिके अक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥
बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥
लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥
आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥
अभंग ४५४७
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥
भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥
एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥
आजिवरि आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥
तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥
राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥
सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥
त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥
अभंग ४५४८
लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥
शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥
मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चत्ति जालें त्यांचें ॥४॥
त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥
चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥७॥
अभंग ४५४९
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥
गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥
काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥
अभंग ४५५०
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥१॥
कळलें चि नाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥
विसरु कामाचा तुका म्हणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥
अभंग ४५५१
जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥
कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठीं क्त देहावरि । आणिताहे हरि बोलावया ॥३॥
यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥
मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥
करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥
पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१०॥
संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाहीं ॥११॥
अभंग ४५५२
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥
सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाईं वत्स पशु जीवां ॥४॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनियां ॥५॥
अभंग ४५५३
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥
देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥
दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥
नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५५४
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरि वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥
भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥
वत्सें गाईं पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥
चत्ति वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥
अभंग ४५५५
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥
अभंग ४५५६
नाचतां देखिलीं गाईं वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥
विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥
सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥
समागमें गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥
संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥
करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥
नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
अभंग ४५५७
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥२॥
वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥
सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा म्हणे घरा ॥४॥
राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥
त्यांच्या तुका म्हणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥
अभंग ४५५८
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥
त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
अभंग ४५५९
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥
अभंग ४५६०
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥
न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥
रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥
उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥
कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥८॥
पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥९॥
जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
अभंग ४५६१
सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥
आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥
नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥
हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५६२
द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥
अभंग ४५६३
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥
जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥
बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥५॥
रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव जाला ॥६॥
अभंग ४५६४
जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥३॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥
भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥
अभंग ४५६५
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥
भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥
जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
अभंग ४५६६
नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचाम ॥२॥
अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥
सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥
मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकळिक एक राज्य ॥५॥
राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥
सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥७॥
अभंग ४५६७
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५६८
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणों यासि ॥२॥
यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥
धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥
न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥
वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
अभंग ४५६९
तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥
दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥
त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥
तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाहीं तुका म्हणे चत्तिा । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥
अभंग ४५७०
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥
कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
अभंग ४५७१
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥
ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥
लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥
काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥
अभंग ४५७२
चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥
चुकवुनि जन्म देईंल आपणा । भजा नारायणा तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५७३
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥
दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥
भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
अभंग ४५७४
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥
रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥
उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥
आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥
नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥
अभंग ४५७५
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥१॥
ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥
घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥५॥
अभंग ४५७६
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥
द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥
पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥
अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥
अभंग ४५७७
धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरलें ॥१॥
उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥
दिनानाथब्रिदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥
ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥
बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥
अभंग ४५७८
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥
वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥
अभंग ४५७९
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती क्त मुख लावूनियां ॥३॥
याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥
अभंग ४५८०
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥
भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥
रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥
नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥
अभंग ४५८१
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥
कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥३॥
जातों येतों आम्ही देवाचे सांगांतें । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥
अभंग ४५८२
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥
वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥
नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥
नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥
तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥
अभंग ४५८३
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥
चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥
एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥३॥
दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥
भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥
नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसिद्धि ॥६॥
सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका म्हणे देखा पांडुरंगा ॥७॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने