
संत निवृत्तिनाथ महाराज
परिचय
संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरू होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांचा जन्म इ.स. १२७३ साली झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेवरील भाष्य लिहिण्याचा आदेश दिला आणि त्यातूनच ‘ज्ञानेश्वरी’ जन्माला आली.
गुरुपरंपरा आणि अध्यात्म
गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. "निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गहिनीनाथे सोय दाखविली ॥" हा अभंग त्यांचे लक्ष्य स्पष्ट करतो. त्यांनी सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ रचला. हे अभंग योग, अद्वैत आणि कृष्णभक्ती यांवर आधारित होते.
लेखन आणि कार्य
निवृत्तिनाथांची प्रमुख ग्रंथरचना म्हणजे निवृत्तिदेवी, निवृत्तिसार, उत्तरगीताटीका (अनुपलब्ध). रा. म. आठवले यांनी 'निवृत्तेश्वरी' ग्रंथास त्यांच्याशी संबंधित मानले आहे. धुळे येथील समर्थवाग्देवता मंदिरात 'सटीक भगवद्गीता' आणि 'समाधिबोध' ही दोन हस्तलिखिते सापडली आहेत.
संत ज्ञानेश्वरांवर प्रभाव
निवृत्तिनाथांनी आपले संपूर्ण अध्यात्मिक ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले. त्यांनी ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई यांच्यासह अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यांनी मार्गदर्शनाने वारकरी संप्रदायाची शिकवण पुढे नेली.
संजीवन समाधी व पौष वारी
संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी, शके १२१९ (२३ जून १२९७) रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. ही समाधी दाट जंगलात लपलेली होती. इ.स. १८१०-१८२५ च्या सुमारास जोपुळ (ता. दिंडोरी) येथील संत पाटीलबुवा रखमाजी उगले यांनी ती शोधून काढली. त्यांनीच त्र्यंबकेश्वर येथे लहानसे मंदिर बांधले व पौष महिन्यातील पायी वारी सुरू केली, जी आजही प्रसिद्ध आहे.
हेही वाचा: संत निवृत्तींनाथ महाराज यांचे १० निवडक अभंग
संत निवृत्तिनाथांचे योगदान
त्यांचे महान योगदान म्हणजे संत ज्ञानेश्वर यांना दिलेले अध्यात्मिक मार्गदर्शन, वारकरी संप्रदायाला दिलेली गती आणि कृष्णभक्तीचा प्रसार. संत निवृत्तिनाथ हे निवृत्तीच्या मार्गाचे मूर्तिमंत उदाहरण होते.
राम कृष्ण हरि श्री संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम ज्ञानोबा माऊली तुकाराम
उत्तर द्याहटवाराम कृष्ण हरी माऊली
उत्तर द्याहटवा